- छत्रपती शिवरायांची आग्राहून सुटका प्रसंग गरूड झेप म्हणून राबविणार
आग्रा ते राजगड शिवज्योत पायी वारी
बीड l ऐतिहासिक पुरंदरच्या तहात ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज बाल शंभूराजेसह निवडक मावळ्यांनिशी आग्रा येथे औरंगजेबाच्या दरबारात गेले होते.स्वराज्यापासून कोसो दूर असलेल्या मोगली साम्राज्यात शिवराय अडकून पडले होते.तिथे त्यांच्या जीविताला व पर्यायाने स्वराज्यालाच धोका निर्माण झाला होता.पण भल्याभल्यांची मती कुंठीत करण्याचे अकल्पित बुद्धी चातुर्य शिवरायांजवळ होते.महाराजांनी मोठ्या शिताफीने औरंगजेबाच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली.महाराज आग्राहून निसटले तो दिन होता 17 आॕगस्ट 1666.महाराजांची ती अकल्पित झेप म्हणजे गरूडझेप होती.
महाराजांच्या या गरूड झेपेचा इतिहास पुन्हा नव्याने दरवर्षी पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.शिवरायांच्या सैन्यातील पायदळाचे प्रमुख सरदार पिलाजीराव गोळे यांचे थेट वंशज असलेले ॲड.मारूती गोळे यांच्या नेतृत्वाखाली यावर्षीपासून आग्रा ते राजगड शिव विचारांची शिव ज्योत घेऊन तीस तरूण मावळे तेरा दिवसात 1200 किमी धावणार आहेत.
सतरा आॕगस्ट रोजी आग्रा येथे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला स्वराज्यातील राजगड,रायगड,पन्हाळा,प्रतापगड,लिंगाणा,वासोटा ,हरिश्चंद्रगड ,सुधागड,केंजळगड,रतनगड अशा एकावन्न किल्ले तसेच गंगा ,अलकनंदा,यमुना अशा सात नद्यातील व पवित्र अशा कळसुबाई,शिवथरघळ येथील पाण्याने जलाभिषेक करण्यात येणार आहे.शिव स्मरण प्रवास मार्गात दहा हजार वृक्षाच्या बिया टाकण्यात येणार आहेत.राजगडावरील माती नेऊन आग्रा येथे व आग्रा येथील माती आणून राजगडावर वृक्षारोपन करण्यात येणार आहे.
आग्रा येथील शिव ज्योत परिक्रमा आरंभ कार्यक्रमास राजगड ग्रंथाचे लेखक राहुल नलावडे पुणे, *बीडचे दुर्गप्रेमी कचरू चांभारे* ,इंजि.श्रीरंग राहिंज अहमदनगर , सोपान तुपे ,तानाजी राजगुडे पुणे हे आग्रा येथील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
ॲड.मारूती गोळे यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक गरूडझेप इतिहासाला जिवंत करणार आहे.ग्वाल्हेर,शिवपूर,गुणा,देवास,सेंधवा इंदुर मार्गे मुक्काम करून गरूडझेप पायीवारी शिरपूर धुळे मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करेल.धुळे चांदवड सिन्नर नारायणगाव मार्गे शिव ज्योत वारी 29 आॕगस्ट रोजी राजगडावर पोहचेल.
महाराष्ट्रातील व देशभरातील अनेक नामवंत व्यक्तींनी गरूडझेप मोहिमेस शुभेच्छा दिल्या आहेत.