ताजोद्दिनबाबांनी भर किर्तनातच सोडला प्राण; महाराष्ट्रावर शोककळा, ह्रदयविकाराचा झटका




धुळे : प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प ताजोद्दीन शेख महाराज यांचे निधन झाले आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जामदे गावी कीर्तन सुरु असतानाच महाराजांना अचानक भोवळ आली आणि त्यांनी जीव सोडला. गावातील राम मंदिरामध्ये सुरु असलेल्या सप्ताहा दरम्यान कीर्तन करत असताना शेख महाराजांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांनी कीर्तनातच प्राण सोडला.
ह.भ.प ताजोद्दीन शेख महाराज हे मुस्लिम धर्मीय असले तरी ते हिंदू देवी-देवतांचे कीर्तन करत होते. वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती. सोमवार 27 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता ते ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन करत होते. अचानक छातीत दुखू लागल्यामुळे ते व्यासपीठावरच खाली बसले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्यांनी व्यासपीठावरच आपला जीव सोडला. भाविकांनी त्यांना तात्काळ शनिमांडळ येथील रुग्णालयात नेले. त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नंदुरबारमधील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र हळहळला :  ताजोद्दीन महाराज यांचे कार्य प्रंचड मोठे होते. अवघ्या महाराष्ट्रात ते कीर्तन करत होते. त्यामुळे, त्याचा अवघ्या महाराष्ट्राभर भक्त वर्ग आहे.  धार्मिक कट्टर पंथियांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी वारकरी संप्रदायाचे कार्य अत्यंत निष्ठेने केल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ह.भ.प ताजोद्दीन शेख महाराज यांची प्राणज्योत मालवल्याने अवघ्या महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.

दोन वर्षांपूर्वी केलेले खरे ठरले उद्गार : दोन वर्षांपूर्वी साक्री तालुक्यातील प्रतापूर येथे सप्ताहानिमित्त ह.भ.प ताजोद्दीन महाराज शेख यांचे कीर्तन आयोजित केले होते. या कीर्तनात ते म्हणाले होते की, मला कीर्तन करताना मरण आले, तर माझ्या सारखा भाग्यवान मीच असेन. त्यांचे हे दोन वर्षांपूर्वीचे उद्गार खरे ठरले असून त्यांना कीर्तन करतानाच मरण आले आहे.

मला हिंदू मुस्लीम धर्म प्रिय : हिंदू धर्माबरोबरच मुस्लीम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन धर्मातील महत्वाच्या गोष्टींवर महाराज भाष्य करत आणि लोकांना फटकारत. मी मुस्लीम धर्मात जन्माला आलो असलो, तरी हिंदू धर्मातच मरणार, असे ते नेहमीच कीर्तनातून सांगत आले आहे. मला हे दोन्ही धर्म प्रिय आहेत. जन्माला आलो म्हणून मुस्लीम तर संत साहित्याच्या स्पर्शामुळे हिंदू धर्म मला फार प्रिय झाला असूनत्या धर्मातच मी मरणार आहे, असे महाराज म्हणत.

महाराजांनी केली औरंगाबादेतून सांप्रदायिक कार्याची सुरुवात : ताजोद्दीन महाराजांनी आपल्या सांप्रदायिक कार्याची सुरुवात औरंगाबाद शहरातून केल्याची माहिती पुढे येते आहे. कीर्तन, भारूडे, गवळणी आणि रामायण कथा याचा महाराजांना मोठा अभ्यास होता. संत साहित्याबरोबरच, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सावरकर यांच्यासंदर्भातही ते आपल्या कीर्तनातून भाष्य करत होते. त्यामुळे, लोकांना ते अधीक प्रिय वाटत होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा