मुंबईला अतिवृष्टीचा इशारा
अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकात चालले आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून हे वादळ पुढे गुजरातच्या दिशेने जाणार असल्याचा अदांच व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीतील यंत्रणांना सर्तक करण्यात आल्या आहे.
Daily marathwada patra Team
मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकात चालले आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून हे वादळ पुढे गुजरातच्या दिशेने जाणार असल्याचा अदांच व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीतील यंत्रणांना सर्तक करण्यात आल्या आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दुसरीकडे वादळाची चाहूल लागली असून, कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस झाल्याने घरांसह शेतमालाचे प्रचंड नुकसान झाल्याचे वृत्त आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याचा वेग वाढलेला आहे.
दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले चक्रीवादळ तौते गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. शनिवारी सायंकाळी ताशी ३० ते ४० किलोमीटरने वादळ पुढे सरकत होते. हवामाना विभागाच्या ताज्या माहितीप्रमाणे हे वादळ सध्या मुंबईच्या दक्षिणेला ४९० किमी अंतरावर असून, १८ मे रोजी ते गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे.
हे चक्रीवादळ गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरून जाणार असल्याने राज्यात अनेक जिल्ह्याला तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबईत अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमधील ५८० रुग्णांना रात्रीतूनच सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर दुसरीकडे चक्रीवादळाच्या आगमनाआधीच राज्यातील काही जिल्ह्यात वाऱ्याच्या वेग वाढला आहे. तर काही ठिकाणी पावसालाही सुरूवात झाली आहे. शनिवारी रात्री मुंबईत पाऊस झाला. तिकडे कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांना लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसामुळे नुकसान झालं आहे. इचलकरंजीत शनिवारी रात्री पावसाला सुरूवात झाली. तर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये घरांची पडझड झाली आहे. वारे आणि पावसामुळे पिकांचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. वादळाच्या पार्श्वभूमीवर राजापूर, रत्नागिरी तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर गुहागर व दापोली तालुक्यातही संचारबंदी लागू केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास १०४ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वाऱ्याचा वेग वाढला आहे.
असा असेल चक्रीवादळाचा मार्ग : तौते चक्रीवादळ १६ मे रोजी अतितीव्र स्वरूप धारण करणार आहे. त्यामुळे समुद्रात वाऱ्यांचा वेग ताशी १२५ ते १७५ किलोमीटर असेल. १६ ते १८ मे या कालावधीत ते अतितीव्रच राहणार असून, याच काळात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळून जाणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या संभाव्य मार्गानुसार चक्रीवादळ १८ मे रोजी दुपारी किंवा संध्याकाळी गुजरातच्या पोरबंदरजवळ धडकून पुढे जाणार आहे. त्यानंतर त्याचा वेग आणि प्रभाव कमी होणार आहे. मात्र, त्यामुळे गुजरातमध्ये त्याचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.