बीड – फडणवीस सरकारच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले असून या प्रकरणी परळी पोलिसात तत्कालीन कृषी अधीक्षक रमेश भताने सह 6 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ माजली आहे .
सदर आरोपींनी केलेला भ्रष्टाचार सिद्ध झाल्याने त्यांचेवर गुन्हे दाखल करा असा आदेश उपसचिव महाराष्ट्र राज्य यांनी दिला होता. यानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणात परळीचे तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून, परळी शहर पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने यांच्यासह भीमराव बांगर, शंकर गव्हाणे, दीपक पवार, सुनील रामराव जायभाये व सौ कमल लिंबकर ह्या सहा आरोपी विरुद्ध जलयुक्त शिवार योजनेत इ स 2015 ते 2017 दरम्यान 18 लाख 32 हजार 336 रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी कलम 420, 408, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेची कृषी खात्याच्या दक्षता पथकाकडून दोन वेळेस चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये 138 मजूर संस्था तसंच 29 गुत्तेदार व सुशिक्षित बेकार अभियंता 28 अधिकारी यांच्यावर एफआयआर दाखल करून निलंबनाची कारवाई झाली. मात्र मुख्य आरोपी रमेश भताने विभागीय कृषी सहसंचालक सेवानिवृत्त यांच्यासह इतर 5 अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात येऊनही गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.