म्युकरमायकोसिस संसर्गजन्य आजार नाही ; तो जमिनीतून शरिरात जातो




मुंबई : कोरोना संकटासह राज्यात म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी आजाराचे थैमान वाढत आहे. राज्यात विविध भागात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत आहेत. या आजारामुळे राज्यात 90 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलीये. कोरोना टास्क फोर्समधील डॉ. तात्याराव लहाने यांनी या आजाराबाबत महत्वाची माहिती दिली आहे. म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. यापूर्वीही म्युकरमायकोसिस हा आजार होता असे डॉ. लहाने यांनी सांगितले.

म्युकर जमिनीतून आपल्या शरिरात जातो. तो हवेतून पसरतो असे म्हणता येणार नाही. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना म्युकरमायकोसिसची लागण होते. म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही, असे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात साथीच्या आजारात याचा समावेश केलेला आहे. राज्यात म्युकरमायकोसिसच्या सध्या 800 केसेस आहेत. 110 ठिकाणी म्युकरच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात या आजारावरील औषधे सध्या कमी आहे. आधी याची गरज नसल्याने कंपन्यांनी त्याचे उत्पादन केले नव्हते. मात्र, आता राज्य सरकारने म्युकर मायकोसिसवरील औषधांवर नियंत्रण ठेवलेय. राज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या औषधांचे वितरण होत असल्याची माहितीही डॉ. लहाने यांनी दिलीय.

कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारकडून सध्या उद्योगांचा ऑक्सिजन रुग्णालयांकडे वळवलाय. मात्र, या इंडस्ट्रियल ऑक्सिजनमुळे म्युकरमायकोसिस होतो, अशी चर्चा सुरु आहे. त्याबाबत माहिती देताना इंडस्ट्रियल ऑक्सिजनमुळे म्युकरमायकोसिस होतो असे नाही, अशी माहिती डॉ. लहान यांनी स्पष्ट केलेय. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी काळजी घेतली पाहिजे. मातीशी संपर्क येऊ देऊ नका. म्युकरची लक्षणे दिसून आल्यास तातडीने डॉक्टरकडे जा, असे आवाहन डॉ. लहाने यांनी केलेय.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा