पिके पाण्यात, शेतकरी कोमात दोन दिवसात पुन्हा ८३ मी मी पाऊस
सहा वर्षानंतर तलाव ओव्हरफ्लो
नेकनूर । दि २८ ( रामनाथ घोडके)
गेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानंतर शनिवारी रात्री पुन्हा नेकनूर ला पावसाने झोडपले ३३ मी. मी.एवढ्या पावसाची नोंद झाल्यानंतर ,रविवार ही रिमझिम पाऊस झाल्यानंतर काल पुन्हा ४९ मी मी पाऊस झाल्याने सर्व पिके पाण्यात गेल्याने शेतकरी कोमात गेले आहेत. नेकनूर येथील शिक्षक कॉलनी आणि नन्नवरे वस्ती जवळील पाझर तलाव मागील सहा वर्षात प्रथमच भरले आहे. नेकनूर ला पाणीपुरवठा करणारे भंडारवाडी तांदळवाडी ,बाभळगाव ओव्हरफ्लो झाली आहे.
ऑगस्टमधील पावसाच्या खंडा मुळे खरिपाच्या ५० % पिकाचे नुकसान झाले होते. सप्टेंबर मध्ये पावसाला सुरुवात झाली पाउस काही थांबायचे नाव घेत नाही. मागील दोन आठवड्यापासून सतत पाऊस व त्यामध्ये तीन वेळा अतिवृष्टी व ढग फुटी सदृश्य पाऊस यामुळे खरीप पिकावर खराटा फिरला असून काढणीला आलेल्या सोयाबीन पाण्यात तरंगताना दिसून येत आहे. तूर, मूग, उडीद, कांदा,बाजरी, कापूस यासारखे सर्वच खरीप पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली असून आता पाहत राहण्यात पलीकडे शेतकरी काही करू शकत नाही. रोजच्या जोरदार पावसामुळे शेतातून खळखळून पाणी वाहत असून विहिरी तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.मागील दहा वर्षात सर्वात जास्त पाऊस आतापर्यंत झाला असून शेतकऱ्यांचे सर्व होत्याचे नव्हते झाले आहे. एवढे होऊन सुद्धा शासनाकडून ओला दुष्काळ जाहीर होत नाही. त्यासाठी पूर्ण शेत वाहून जायला हवेत का ? त्यानंतरच सरकार दुष्काळ जाहीर करुन मदत जाहीर करणार का ? असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.