बीड ! बीड शहरात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विधी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये दोन कोरोना केअर सेंटर असून तेथे जवळपास दोनशे रुग्ण उपचार घेत आहेत. आवश्यक असलेले पाणी पुरवण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. नगर परिषदेने त्यांना टँकरद्वारे पाणी पुरविणे आवश्यक आहे. मात्र नगर पालिका पाणी देत नसल्याने आणि कमी पाणी देत असल्यामुळे रुग्णांना संकटाचा सामना करावा लागत असल्याची तक्रार जन आंदोलनाची विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केली आहे.
माजलगाव धरणामध्ये आणि बिंदुसरा धरणामध्ये मुबलक पाणी असताना बीडची नगर परिषद बीड शहर वासीयांना पाहिजे तेवढे पाणी देत नाही. मात्र कोरोना पोजिटीव्ह आलेल्या रुग्णांना तरी त्यांनी पाणी द्यावे. एक किंवा दोन दिवसाला दोन हजार लिटरचा टॅंकर जर दिला जात असेल तर दोनशे लोकांना ते कसे पूरणार ? हा प्रश्न निर्माण होतो.
या ठिकाणी असलेल्या कोरोणा रुग्णांची आरोग्य विभागाच्या कामाबद्दल अजिबात तक्रार नाही. त्याच प्रमाणे जेवण आणि पिण्याच्या पाण्याबाबत देखील कसलीही तक्रार नाही. मात्र सांडपाणी नगर पालिका वेळेवर देत नसल्याने या ठिकाणच्या कर्मचार्यांना देखील विनाकारण समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त आणि आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष द्यायचे का नगर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे उद्भवलेल्या प्रश्नांना उत्तरे देत बसायचे ? हा प्रश्न इथे निर्माण होत आहे. नगर पालिकेच्या कामामुळे रुग्णांच्या मानसिकतेवर देखील परिणाम होतो.
दुर्दैवाची बाब अशी की, या ठिकाणच्या रुग्णांना बाटली घेऊन बाहेर पडावे लागत आहे. ही बाब चांगली नाही. नगर पालिकेचा भोंगळ कारभार ताबडतोब सुधारुन दररोज मुबलक पाणी द्यावे. अन्यथा या समस्या बाबत आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असे ही देशमुख यांनी म्हटले .