दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल होणार जाहीर।




मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदाचा म्हणजे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला १० वीचा ऑनलाइन निकाल उद्या दि.16 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेली आहे. या वर्षीची दहावीची परीक्षा वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर  रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन पद्धती जाहीर करण्यात आली होती.
यंदा म्हणजे २०२१ साली एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेस पात्र ठरलेले होते. त्यापैकी ९ लाख ९ हजार ९३१ मुले असून मुलींची संख्या ७ लाख ४८ हजार ६९३ इतकी आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत सन २०२१ मध्ये इयत्ता १० वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे अंतर्गत गुणांच्या साहाय्याने करण्यात आले आहे. १०० गुणांच्या मूल्यमापनामध्ये ५० गुण हे या विद्यार्थ्यांच्या नववीच्या गुणांच्या साहाय्याने दिले जातील. तर उरलेले ५० गुण हे दहावीच्या मूल्यमापनावर आधारित असतील. विद्यार्थ्यांना जर मिळालेले गुण समाधानकारक वाटत नसतील तर करोना प्रादुर्भाव संपल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीच्या संदर्भात शिक्षकांचे प्रशिक्षण आणि वेबिनारचं आयोजन १० जून रोजी करण्यात आले होते. त्यानंतर २३ जून ते ०२ जुलै या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांनी आपल्या संगणक प्रणालीमध्ये हे गुण नोंदवले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा