सरपंच अजय कोमटवार चे जनहित कार्य उल्लेखनीय
दिंद्रुड । प्रतिनिधी
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड हे तालुक्यात सर्वात मोठे सदन गाव म्हणून ओळखले जाते. जवळपास १८ ते २० हजार लोकसंख्येच्या या गावात वर्षाअखेर यावर्षी पाऊस मान कमी झाल्याने पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. येथील सरपंच अजय दिलीपराव कोमटवार यांनी स्वखर्चाने एक हजार लिटरच्या वीस टाक्या गल्लोगल्ली बसवण्याचा निर्धार करत ते मार्गी लावण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून समाधान व्यक्त होत आहे.
धारूर तालुक्यातील चाटगाव येथील तलावातून दिंद्रुड गावाला पाणीपुरवठा होतो. येथील पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही विहिरीतील पाणी पातळी कमी झाली असून, तलावात जेमतेम पाणी शिल्लक आहे. नळाला मिळणारे पाणी अतिशय अशुद्ध व गाळयुक्त येत असल्याने, सरपंच अजय कोमटवार यांनी त्यांच्याकडे असलेल्या दोन बोरवेलच्या माध्यमातून आजोबा स्व.डॉ.हरीनाथ कोमटवार स्मरणार्थ दिंद्रुड गावात गल्लोगल्ली वीस टाक्या बसवण्याचा निर्धार केला आहे. अद्याप दहा टाक्या उभी गल्ली, जैन गल्ली, तांबे गल्ली,संजीवनी मल्टीस्टेटच्या बाजूला, डॉ. आंबेडकर नगर, साठे नगर, देवी मंदिर परिसर, गणपती गल्ली, जैन यांच्या दारासमोर आदी भागात बसवल्या असून, उर्वरित ठिकाणी बसवण्याचे काम सुरू आहे. सर्व ठिकाणी पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. शासनाच्या कुठल्याही निधीची वाट पाहण्यापेक्षा स्वखर्चाने केलेल्या या उपक्रमामुळे दिंद्रुड ग्रामस्थातून सरपंच अजय कोमटवार यांच्या बाबत समाधान व्यक्त होत आहे.
यापूर्वी पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी पाण्याचे टँकर गावात फिरायचे, टँकर गल्लीत गेल्यानंतर तेथे होणारा गोंधळ व भांडणे याला आळा बसवण्यासाठी विविध भागात टाक्या बसवण्यात आल्या आहेत. २४ तास बोरवेल चे पाणी त्या टाक्यांमध्ये पोच झाल्याने भांडणे व वाद निर्माण होणार नाही.
– अजय दिलीपराव कोमटवार,सरपंच, ग्रा.पं.दिंद्रुड.