बार्ज पी-305 वरील बेपत्ता 77 पैकी 34 जणांचा मृत्यू 184 जणांची सुखरुप सुटका




बार्ज पी-305 वरील बेपत्ता 77 पैकी 34 जणांचा मृत्यू
184 जणांची सुखरुप सुटका

Marathwada Patra Team

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा समुद्रात अडकलेल्या जहाजांना मोठा फटका बसला आहे. भारतीय नौदलाचे समुद्रात अडकलेल्यांसाठी मदत आणि बचावकार्य अद्यापही सुरुच आहे. बार्ज P-305 वरील 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. मुंबईच्या समुद्रात अडकलेल्या बार्ज P-305 साठी नौदलाचे ‘ऑपरेशन 707’ सध्या सुरु आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे दोन दिवसांपासून बार्ज P-305 चा नांगर तुटल्याने ते समुद्रात भरकटले होते. तेव्हापासून बार्ज P-305 वर अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या शोध आणि बचावासाठी नौदलाचे ऑपरेशन सुरु आहे. बार्जवरील 185 जणांची सुटका करण्यात आली. परंतु बेपत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी 34 जणांचे मृतदेह नौदलाच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चार मृतदेह आणले असून उर्वरित मृतदेह दुपारपर्यंत आणण्यात येणार असल्याचे समजते. या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांची ओळख पटवून मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. तर उर्वरित बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचे काम नौदलाकडून सुरु आहे.

समुद्रात अडकलेल्या बार्ज P-305 नौकेवर एकूण 261 कर्मचारी अडकले होते. त्यापैकी 184 कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात आली. तर 77 जण बेपत्ता होते. या बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेतानाच नौदलाच्या हाती 34 मृतदेह लागले. दरम्यान नौदलाचे शोध आणि बचावकार्य सुरुच राहणार आहे. आयएनएस तेग, आयएनएस बेट्वा, आयएनएस बीस, P8I विमान आणि सीकिंग हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधमोहीम सुरु आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा